मोशी दुर्घटनेतील जखमींच्या मदतीसाठी धावले केंद्रीय मंत्री रामदास आठवले; संघमित्रा गायकवाड यांनी केले जननेतृत्वाचे कौतुक, महिला सक्षमीकरणासाठी शासनाच्या योजनांचा लाभ देण्याची केली मागणी

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात मुसळधार पावसामुळे कचऱ्याचा प्रचंड ढिगारा घसरून प्रशासकीय इमारतीवर कोसळल्याने झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेतील जखमींची केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. रामदासजी आठवले यांनी आज साईनाथ हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली.

यावेळी त्यांनी जखमींच्या प्रकृतीची सविस्तर माहिती डॉक्टरांकडून जाणून घेत उपचारासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच जखमी व त्यांच्या कुटुंबीयांना धीर देत शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास व्यक्त केला.

रिपब्लिकन पक्ष ऑफ इंडिया (आठवले गट) महाराष्ट्र प्रदेश चीफ सेक्रेटरी तथा संघमित्रा फिल्म प्रॉडक्शनच्या निर्माती संघमित्रा ताई गायकवाड यांनी मा. रामदास आठवले यांच्या संवेदनशील नेतृत्वाचे आणि जनतेप्रती असलेल्या बांधिलकीचे मनापासून कौतुक केले.

संघमित्रा ताई गायकवाड म्हणाल्या, “मा. रामदास आठवले साहेबांसोबत अनेक वर्षे काम करण्याची संधी मला मिळाली आहे. त्यामुळे त्यांचे कार्य मी अगदी जवळून अनुभवले आहे. ते केवळ केंद्रीय मंत्री नाहीत, तर देशातील गरीब, दलित, वंचित आणि सर्वसामान्य जनतेचे खरे लोकनेते आहेत. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचावा, यासाठी ते सातत्याने संघर्ष करत असतात. कोणतीही दुर्घटना घडली की साहेब स्वतः जखमी आणि पीडितांच्या मदतीसाठी धाव घेतात. त्यामुळेच देशभरातील जनतेमध्ये त्यांच्याविषयी अपार प्रेम, आदर आणि विश्वास आहे.”

यावेळी संघमित्रा ताई गायकवाड यांनी महिला सक्षमीकरणावरही विशेष भर देत सांगितले की, “महिलांना शासनाच्या विविध स्वावलंबन, स्वयंरोजगार आणि उद्योजकता योजनांचा जास्तीत जास्त लाभ मिळाला पाहिजे. आर्थिकदृष्ट्या सक्षम महिला ही मजबूत कुटुंब आणि सक्षम समाजाची ओळख आहे.”

त्यांनी पुढे सांगितले की, “ज्या महिला स्वतःचा उद्योग-व्यवसाय सुरू करू इच्छितात, त्यांना आर्थिक मदत, प्रशिक्षण, बँक कर्ज, मार्गदर्शन आणि शासनाचे सहकार्य सहज उपलब्ध झाले पाहिजे. महिलांना व्यवसायासाठी आवश्यक ते सहकार्य मिळणे ही काळाची गरज आहे.”

संघमित्रा ताई गायकवाड यांनी महाराष्ट्रातील रिपब्लिकन पक्षाच्या सर्व महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आवाहन करत म्हटले, “ज्या महिला स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत किंवा उद्योग-व्यवसाय सुरू करू इच्छितात, अशा महिलांना प्रत्येक महिला कार्यकर्तीने मदतीचा हात द्यावा. त्यांना शासनाच्या योजनांची माहिती द्यावी, अर्ज प्रक्रियेत सहकार्य करावे आणि त्यांना सक्षम बनविण्यासाठी पुढाकार घ्यावा. महिला सक्षमीकरण हीच खरी समाजसेवा आहे.”

शेवटी त्यांनी मोशी दुर्घटनेतील सर्व जखमींना लवकरात लवकर पूर्ण बरे वाटावे, अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली. तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी अधिक प्रभावी सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.

   

मोशी दुर्घटनेतील जखमींच्या मदतीसाठी धावले केंद्रीय मंत्री रामदास आठवले; संघमित्रा गायकवाड यांनी केले जननेतृत्वाचे कौतुक, महिला सक्षमीकरणासाठी शासनाच्या योजनांचा लाभ देण्याची केली मागणी